Monday, November 28, 2016

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय १४

श्रीगणेशाय नमः 
जयजयाजी पंढरीनाथा ॥ समचरणीं भक्ततापशमिता ॥ कटीं कर नासाग्रीं दृष्टी ठेविता ॥ होसी रंजिता मुनिमानसा ॥१॥ 
ऐसा स्वामी तूं करुणाकार ॥ तरी तूं बोलवीं भक्तिसार ॥ मागिले अध्यायीं कथानुसार ॥ परम कृपें वदविला ॥२॥ 
त्या कृपेचा बोध सबळ ॥ ब्रह्म उदधि पावला मेळ ॥ पात्रा मैनावती सबळ ॥ सरिताओंघीं दाटली ॥३॥ 
ॐ नमो ब्रह्मार्णवीं दाटली परी ॥ ऐक्यरुप झाली नारी ॥ मोहें पुत्राचें परिवारीं ॥ गुंतलीसे जननी ते ॥४॥

मनासी म्हणे अहा कैसें ॥ त्रिलोचनरायाचें जाहले जैसें ॥ त्याचि नीतीं होईल तैसें ॥ मम सुताचें काय करुं ॥५॥ 
जंव जंव पाहे त्यातें दृष्टीं ॥ तंव तंव वियोग वाटे पोटीं ॥ हदयी कवळूनि जठरवेष्टी ॥ होत असे मोहानें ॥६॥ 
अहा पुत्राचें चांगुलपण ॥ दिसे जैसा प्रत्यक्ष मदन ॥ परी काय करावें चांगुलपण ॥ भस्म होईल स्मशानीं ॥७॥ 
उत्कृष्टपणें करोनि कष्ट ॥ धाम उभाविलें अति श्रेष्ठ ॥ परी वन्हिबळें लागल्य काष्ठ ॥ तेवीं असे काळाग्नी ॥८॥ 
पहा पल्लवपत्रझाड ॥ अति विशाळ लावला पाड ॥ परी गाभारी वेष्टितां भिरुड ॥ उशाशीं काळ बैसला ॥९॥ 
तन्न्यायें दिसूनि येत ॥ वायां जाईल ऐसा सुत ॥ कीं कद्रूलागीं चोखट अमृत ॥ फिकरपणे मिरविले ॥१०॥ 
कीं यत्नेंकरुनि कचें दुर्घट ॥ संजीवनीचा केला पाठ ॥ परी देवयानीचा शाप उल्हाट ॥ यत्र व्यर्थ तो झाला ॥११॥ 
कीं सुंदर जाया कर्मे जारिणी ॥ परी पतिभयाच धाक मनीं ॥ तेवीं तो उशाशीं काळ बैसोनि ॥ सकळ जनां मिरवला ॥१२॥ 
कीं कुसुमशेज मृदुलाकार ॥ परी उसां घालूनि निजे विखार ॥ ते सुखनद्रेचा व्यापार ॥ सुखा लाहे केउता ॥१३॥ 

तन्न्यायें झालें येथ ॥ राजवैभव अपरिमित ॥ परी काळचक्राची सबळ बात ॥ भ्रमण करीत असे पैं ॥१४॥ 
ऐसी सदासर्वकाळ ॥ चित्तीं वाहे माय तळमळ ॥ परी सुतासी बोध कराया बळ ॥ अर्थ कांही चालेना ॥१५॥ 
तंव कोणी ऐके दिवशीं ॥ शीतकाळ मावमासीं ॥ उपरी सहपरिचारिकेंसीं उष्ण घेत बैसलीसे ॥१६॥ 
ते संधींत गोपीचंद ॥ चौकीविभागीं सकळ स्त्रीवृंद ॥ वेष्टूनि स्नान कराया सिद्ध ॥ चंदनचौकीं बैसला ॥१७॥ 
चंदनचौकी परी ते कैशी ॥ हेमतगंटी रत्न जैशीं ॥ जडावकोंदणी नक्षत्रांसीं ॥ राजवृंदीं चमकतसे ॥१८॥ 
सकळ काढूनि अंगींचे भूषण ॥ वरी विराजे राजनंदन ॥ उष्ण उदकीं करीत दंतधावन ॥ चौकीवरी बैसला ॥१९॥ 
तों सौधउपरी मैनावती ॥ झाली स्वसुतातें पाहती ॥ देखिला जैसा पूर्ण गभस्ती ॥ तेजामाजी डवरला ॥२०॥ 
राजसेवकाचें भोवतें वेष्टन ॥ परिचारिका वाहती जीवन ॥ परी त्या मंडळांत नृपनंदन ॥ चांगुलपर्णी मिरवतसे ॥२१॥ 
जैसा अपार पाहतां स्वनंदन ॥ मोहें आलें उदरवेष्टन ॥ तेणें लोटलें अपार जीवन ॥ चक्षूंतूनि झराटले ॥२३॥ 

परी ते बुंद अकस्मात ॥ मोहें घ्राणाचे उदभव व्यक्त ॥ गोपीचंद चातकातें ॥ स्पर्शावया धावले हो ॥२४॥ 
म्हणाल बुंद चक्षूदकीं ॥ नोहे उरते सत्कर्मवाकीं ॥ उत्तम फळांवें लक्षूनि सेकी ॥ व्यक्त जलें ते अंगासी ॥२५॥ 
बुंद नव्हती ते चिंतामणी ॥ हरुष केला भवकाचणी ॥ कीं कृतांतभयातें संजीवनी ॥ भूपशरीरा आदळले ॥२६॥ 
कीं अर्के पीडित भारी ॥ नृपजन वेष्टला नगरी ॥ तैं ते उतरले घन मनहरी ॥ बुंदवेश धरुनियां ॥२७॥ 
कीं काळक्षुधेचा पेटला अनळ ॥ तेणें शरीर झालें विकळ ॥ ते संधींत होऊनि कृपाळू ॥ कामधेनु उतरली ॥२८॥ 
कीं दरिद्राचें अतिवेष्टन ॥ तैसा येथें मिरविला कुबेर येऊन ॥ तन्न्याय सुबुंद घन ॥ रावहदयीं आदळले ॥२९॥ 
शरीरीं होतां बुंद लिप्त ॥ परी उदभवस्थिती लागली त्यांत ॥ म्हणूनि ऊर्ध्व करुनि मूर्धातें ॥ नभालागीं विलोकीं ॥३०॥ 
हदयीं होऊनि राव शंकित ॥ म्हणे बुंद कैंचा उदभवला येथ ॥ तरी अंबर झालें असेल व्यक्त ॥ घनमंडळ आगळें ॥३१॥ 
म्हणूनि ऊर्ध्व करुनि दृष्टी ॥ पाहता झाला नभापोटीं ॥ परी ते निर्मळपणें वृष्टी ॥ झाली कोठूनि म्हणतसे ॥३२॥ 

ऐसा विचार करितां चित्तीं ॥ दृष्टिगोचरी संभविती ॥ तों रुदन करितां मैनावती ॥ निजदृष्टीं देखिली ॥३३॥ 
करीत होता दंतधावन ॥ तैसाचि उठला नृपनंदन ॥ उपरी त्वरा वेगीं चढून ॥ मातेपाशीं पातला ॥३४॥ 
जातांचि पदी ठेवूनिया माथा ॥ उभा जोडूनि हस्तां ॥ म्हणे सांग जी कवण अर्था ॥ उचंबळलीस जननीये ॥३५॥ 
मजसारखा तूतें सुत ॥ राज्याधीश महीं व्यक्त ॥ ऐसा असूनि दुःखपर्वत ॥ कोठूनि उदेला तंव चित्तीं ॥३६॥ 
पाहें पाहें प्रताप आगळा ॥ न वर्णवे बळ बळियांकित महीपाळा ॥ मिरवती दर्पकंदर्प केवळा ॥ करभारातें योजिती ॥३७॥ 
ऐसी असतां बळसंपत्ती ॥ बोललें कुणी दुःखसरितीं ॥ तरी मम कोपाचा दाहक गभस्ती ॥ सांवरेल कोणातें ॥३८॥ 
जेणें पाहिलें असेल नयनीं ॥ उगीच तीव्र दृष्टी करोनि ॥ तरी तयाचे क्षणें चक्षु काढोनि ॥ तव करीं माये ओपीन गे ॥३९॥ 
किंवा दाविलें असें बोटी ॥ तरी तींच बोटें काढीन शेवटीं ॥ तरी कवण अर्थ उदेला पोटीं ॥ रुदन कराया जननीये ॥४०॥ 
अष्टविंशति स्त्रीमंडळ ॥ कीं त्यांनीं ओपिलें कडुवट फळ ॥ तरी शिक्षा करुनि तयां सबळ ॥ मोक्षपंथा मिरवीन ॥४१॥ 

किंवा माझिये दृष्टी सेवेशीं ॥ उदया पावला अंतर शेषीं ॥ म्हणूनि उदय शोकानिशी ॥ दर्शविली त्वां मातें ॥४२॥ 
तरी कोणता कवण अर्थ ॥ माते वदे प्रांजळवत ॥ कामनीं वेधक असेल चित्त ॥ तोचि वेध निवटीन मी ॥४३॥ 
म्हणसील कार्य आहे थोर ॥ करुं न शके सुत पामर ॥ तरी हा देह वेंचूनि समग्र ॥ अर्थ तुझा पुरवीन मी ॥४४॥ 
जरीं ऐशिया दृष्टीं ॥ अंतर पडेल काय पोटीं ॥ तरी धिक्कार असो मज शेवटीं ॥ पुत्रधर्म मिरवावया ॥४५॥ 
मग श्वान सूकर काय थोडीं ॥ अवतार मिरविती द्वारीं पवाडी ॥ याचि नीति तया प्रौढीं ॥ निर्माण झालों मी एक ॥४६॥ 
अहा पुत्रधर्म मग कैसा ॥ माता पिता दुखलेशा ॥ पाहूनि चित्तीं परी हरुषा ॥ भूमार तो नर एक ॥४७॥ 
आपण मिरवे राणिवा प्रकरणीं ॥ मातापिता दैन्यवाणीं ॥ तयाचे भारें सकळ मेदिनी ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥४८॥ 
कांतेलागी शृंगार व्यक्त ॥ मातेसी वसन नेसावया भ्रांत ॥ तयाचे भारीं धरा समस्त ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥४९॥
कांतेसी नेसावया वस्त्रें भरजरी ॥ माता ग्रंथीं चीर सावरी ॥ तयाचे भारें सकळ धरित्री ॥ विव्हळ दुःखें होतसे ॥५०॥ 

कांतेसी इच्छा समान देणें ॥ मातेसीं खावया न मिळे अन्न ॥ तयाचे भारें पृथ्वी सधन ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥५१॥ 
कांतेसी बसावया उंच शासन ॥ मातेसी कष्टवी दासीसमान ॥ तयाचे भारें धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५२॥ 
रंभेसमान कांता ठेवी ॥ भूतासमान माता मिरवी ॥ तयाचे भारें धरादेवी विव्हळ दुःखी होतसे ॥५३॥ 
जन्म घेतला जियेचे पोटीं ॥ तीते म्हणे परम करंटी ॥ तयाचे भारें धरा हिंपुटीं ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५४॥ 
कांता सर्व सुखाचे मेळीं ॥ माता दुःखें अश्रु ढाळी ॥ तयाचे भारें धरा विव्हळी ॥ आणि दुःखी होतसे ॥५५॥
कांतेलागीं मृदु भाषण ॥ मातेसी हदयी खोंची बाण ॥ तयाचे भारें धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५६॥ 
आपण मिरवे राणिवासरसा ॥ पितया काळा मातंग जैसा ॥ तयांचे भारें धरा क्लेशा ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५७॥
आपण कंठी कुड्या पडुडी ॥ पित्याशिरीं बत्या जोडी ॥ तयाचे मारें धरा मुख मुरडी ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५८॥ 
आपण भक्षी सदा सुरस अन्न ॥ पितर मागती भिक्षा कदन्न ॥ तयाचे भारें ॥ धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५९॥ 

तरी ऐसिये पुत्र सृष्टीं ॥ गळावेत गर्भीहून शेवटीं ॥ तन्न्यास अर्थ पोटीं ॥ माझा न धरी जननीये ॥६०॥
जे तुज वेधक मनकामना ॥ तयासाठीं वेचीन प्राणा ॥ परी माये वो तव वासना ॥ पूर्ण करीन निश्वयेसी ॥६१॥ 
ऐसी बोलता स्वसुत वार्ता ॥ प्रेमान्धि उचंबळला चित्ता ॥ मग हितार्थरत्न द्यावया हाता ॥ वाग्लहरी उचंबळे ॥६२॥ 
म्हणे बारे ऐक वचन ॥ प्रेम उदयाचळीं तूं दिव्यरत्न ॥ उदय पावलासी चंडकिरण ॥ शत्रुतम निवटावया ॥६३॥ 
तया ठायीं अंधकार ॥ मज पीडा वा काय करणार ॥ परिस लाधल्या वसतिस दरिद्र ॥ स्वप्नामाजी नांदेना कीं ॥६४॥ 
बा रे तव प्रताप दर्प ॥ पादरज झाले धूप ॥ ऐसें असतां कोप कंदर्प ॥ मातें कोण विवरील ॥६५॥ 
बा रे तीव्र प्रतापी स्थावर केसरी ॥ तयाचे लेकुरा वारण मारी ॥ हा विपर्यास कवणेपरी ॥ मिरवूं आहे जगातें ॥६६॥ 
राया नरेंद्रा तुझी मी माता ॥ मातें कोण होय गांजिता ॥ परी चिंत्ता उदरी मोहव्यथा ॥ शोकतरु उदवभवला ॥६७॥
बा रे तव स्वरुप पूर्ण अर्क ॥ पाहतां मातें उदेला शोक ॥ म्हणशील जरी अर्थदायक ॥ कवणापरी उदेला तो ॥६८॥

बा रे तव पिता तव समान ॥ स्वरुप उदेलें अर्कप्रमाण ॥ परी काळ अस्ताचळीं जाऊन ॥ गुप्त झाला पुरुष तो ॥६९॥ 
अहा अपार तो स्वरुपाब्धी ॥ अंतीं वेष्टी वडवानळसंधीं ॥ पडतां बा रे विशाळ बुद्धी ॥ भस्म झाला क्षणांतरी ॥७०॥ 
अस्थी जळाल्या काष्ठासमान ॥ लोभ दाहिलें जेउतें तृण ॥ मांसस्नेहाचें होऊनि शोषण ॥ स्वरुपातें लोपला तो ॥७१॥ 
तंव त्या भयाची हुडहुडी मोठी ॥ बा रे मज उदेली पोटीं ॥ तुझें स्वरुप पाहतां दृष्टीं ॥ भयातें उठी उठावे ॥७२॥ 
बा रे कृतांत महीं विखार ॥ धुमधुशीत वारंवार ॥ टपूनि बैसला जैसा मांजर ॥ मूषकातें उचलावया ॥७३॥ 
जैसा व्याघ्र जपे गाई ॥ कीं मीन वेंची बगळा प्रवाहीं ॥ तैसें जगातें तन्न्यायीं ॥ कृत्तांत आहारीं नटलासे ॥७४॥ 
तरी तो व्याघ्र ऐसा सबळ ॥ जिंकूनि योजावा पिंजरीं मेळ ॥ बा रे तैं भयाच वडवानळ ॥ मग स्पर्शणार नाहीं देहातें ॥७५॥ 
बा रे विखार डंखी दुःख ॥ तोंचि वेंचिल्या सकळ सुख ॥ कंटकीं धरिल्यास सकळ वृश्विक ॥ वेदनेतें मिरवेना ॥७६॥ 
ऐसेपरी रचूनि युक्ती ॥ सकळ हरावा कृत्तांत गती ॥ व्यर्थ शरीराची माती ॥ करुं नये जन्मल्यानें ॥७७॥ 

आपण आपुले पहावें हित ॥ सारासार नरदेहांत ॥ पाहें वश्य करुनि रघुनाथ ॥ चिरंजीव झाला बिभीपण ॥७८॥ 
पाहें नारद वैष्णव कैसा ॥ विष्णु पाराधी नरवेषा ॥ तो श्रीगुरु वरदेषा ॥ अमरपणीं मिरविला ॥७९॥ 
त्याचि नारदासी कृपाधन ॥ बोलला श्रीव्यास महीकारण ॥ तेणें पिकलें ब्रह्मपण ॥ शुक महाराज तिसरा ॥८०॥ 
त्याचा कौशिक अनुगृहीत ॥ तेणें करोनि शरणागत ॥ कृष्णयाज्ञवल्की तारुनि निश्वित ॥ तेणें तारिला रामानुज ॥८१॥ 
ऐसा प्रकाश सांप्रदाय मिरवून ॥ ते पुरुष झाले ब्रह्मसनातन ॥ तेवीं तूं बाळा माझा नंदन ॥ जगामाजी मिरवीं कां ॥८२॥ 
ऐसें बोधितां मैनावती ॥ संपली येथूनि तिची उक्ति ॥ परी श्रोते कवि ते संप्रदाय पुसती ॥ सांगा म्हणती चातुर्य ॥८३॥ 
ऐसा प्रश्न कवि पाहून ॥ सांगे संप्रदाय पूर्ण ॥ रामानुजापासून ॥ योगिया संत पैं झाला ॥८४॥ 
तयापासूनि मुकुंदराज ॥ मुकुंदराजाचा जैत्पाल भोज ॥ जैत्पालाचा धर्मानुज ॥ बोधल्यादिक पैं त्याचे ॥८५॥ 
यापरी द्वितीय संप्रदायी ॥ माता सुतातें लोटी बोधप्रवाहीं ॥ उमेनें आराधोनि शिवगोसावी ॥ चैतन्यसंप्रदायीं मिरवला ॥८६॥ 

त्यानें बोधिला कपिलमानी ॥ आणि दुसरा राघवचैतन्यस्वामी ॥ राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी ॥ तयाचा केशवचैतन्य ॥८७॥ 
केशवाचा बाबाचैतन्य ॥ श्रीतुकाराम त्याचा धन्य धन्य ॥ हा चैतन्यसंप्रदाय उत्तम मान्य ॥ संतगणीं मिरवितो ॥८८॥ 
यापरी तिसरा संप्रदाय ॥ महाश्रेष्ठ म्हणती स्वरुपमय ॥ तरी प्रथम बोधिला कमलोद्भव ॥ हंसरुपें श्रीविष्णूनें ॥८९॥ 
ते विधीचे सकळ हित ॥ अत्रीनें घेतले सकळ पंथ ॥ अत्रीपासूनि झाले दत्त ॥ तयापासूनि नाथ सकळ ॥९०॥ 
यापरी सांप्रदाय पाहें ॥ चवथा नंद महीतें आहे ॥ सूर्यापासूनि याज्ञवल्की पाहे ॥ ब्रह्मवेत्ता मिरविला ॥९१॥ 
तयापासूनि सहजानंद ॥ सहजानंदाचा कूर्म अवतार प्रसिद्ध ॥ कूर्मानें उपदेशिला ब्रह्मानंद ॥ ब्रह्मानंदाचा योगानंद कीं ॥९२॥ 
योगानंदाचा चिदानंद ॥ जगीं मिरवत आहे प्रसिद्ध ॥ तरी तुवां गोपीचंद ॥ हित करुनि घेई कां ॥९३॥ 
तेणेंकरुनि अमरपणी ॥ जगीं मिरविसी महाप्राज्ञी ॥ यास्तव बा रे माझे नयनीं ॥ अश्रू लोटले तुजलागी ॥९४॥ 
याउपरी बोले नृपनाथ ॥ बोलसी माते सत्यार्थ ॥ परी प्रस्तुतकाळीं ऐसा नाथ ॥ कोण मिळेल कोठूनि होईल जननीये ॥९६॥ 

ऐसी ऐकूनि तयाची मात ॥ माता बोलती झाली त्यातें ॥ बा रे तैसाचि आपुले गांवांत ॥ जालिंदरनाथ मिरवला ॥९७॥ 
स्वरुप सांप्रदाय परिपूर्ण ॥ तूतें करील ब्रह्मसनातन ॥ तरी तूं कायावाचामनें करुन ॥ शरण जाई तयासी ॥९८॥ 
बा रे तुझें वैभव थोर ॥ राजकारणी कारभार ॥ परी मायिक सकळ विस्तार ॥ लया जाईल बाळका ॥९९॥ 
तरी तनमनधनप्राण ॥ शरण रिघावें तयाकारण ॥ आपुलें हित अमरपण ॥ जगामाजी मिरवीं कां ॥१००॥ 
ऐसें ऐकोनि मातेचें वचन ॥ बोलता झाला त्रिलोचननंदन ॥ म्हणे माते तयासी शरण ॥ जालिया योग्यता फिरावें ॥१॥ 
सकळ टाकूनि सुखसंपत्ति ॥ राजवैभव दारासुती ॥ आप्तवर्गादि सोयरेजाती ॥ टाकूनि योग कैसा करावा कीं ॥२॥ 
द्वादशवरुषें मातें ॥ भोगूं दे सकळ वैभवातें ॥ मग शरण रिघूनि त्यातें ॥ योगालागी कशीन कीं ॥३॥ 
कशीन तरी परी कैसा ॥ मिरवीन ब्रह्मांडांत ठसा ॥ कीं उत्तानपादराजसुतापरी ॥ शिका जगामाजी मिरवीन ॥४॥ 
माता म्हणे बाळा परियेसीं ॥ पळ घडी भरंवसा नाहीं देहासी ॥ तेथे संवत्सर म्हणतां द्वादशो ॥ देखिले कोणी बाळका ॥५॥ 

चित्त वित्त आणि जीवित्व आपुलें ॥ अचळ नोहे अशाश्वत ठेलें ॥ क्षणैक काय होईल न कळे ॥ क्षणभंगुर वर्ततसे ॥६॥ 
बा रे उदकावरील बुडबुडा ॥ कोण पाहील अशाश्वत चाडा ॥ वंध्यापुत्रें घेतला वाडा ॥ मृगजळा केवीं तृषातें ॥७॥ 
तेवीं वारे सहजीस्थतीं ॥ बोलतां न ये अशाश्वती ॥ स्वप्नप्रवाहीं इंद्रपदासी ॥ भोगीत खरे न मानावें ॥८॥ 
तन्न्याय अभासपर ॥ सकळ मिरवतसे चराचर ॥ त्यांतूनि कोणीएक रणशूर ॥ शाश्वतपदा मिरवितसे ॥९॥
शुक दत्तात्रेय कपिलमुनी ॥ व्यास वसिष्ठाची मांडणी ॥ प्रल्हादादिक भागवतधर्मी ॥ ऐसे कोणी निवडिले ॥११०॥ 
नाहींतरी होताती थोडीं ॥ सकळ बांधिली प्रपंचबेडीं ॥ परी यमरायाच्या रक्षकवाडी ॥ एकसरां कोंडिलीं ॥११॥ 
म्हणूनि बा रे सांगतें तुज ॥ शाश्वत नोहे काळ समस्त ॥ कोणे घडी घडेल केउत ॥ अक्कलकळा कळेना ॥१२॥ 
ऐसा बोध माता करितां ॥ लुमावंती तयाची कांता ॥ गुप्तवेषें श्रवण करितां ॥ हाय हाय म्हणतसे ॥१३॥ 
म्हणे माता नोहे पापिणी ॥ पुत्रासी योजिती पुत्रकाचणी ॥ ऐसी राज्यविभवमांडणी ॥ जोग देऊं म्हणतसे ॥१४॥ 

तरी राज्यासी आली विवशी ॥ उपाय काय करावा यासी ॥ रामासारिखा पुत्र वनवासीं ॥ कैकेयीनें धाडिला ॥१५॥ 
स्वभ्रताराचा घेतला प्राण ॥ चतुर्थपुत्रा लाविलें रानोरान ॥ तन्न्याय आम्हांकारणें ॥ देव क्षोभला वाटतसे ॥१६॥ 
दुष्ट स्वप्न दृष्टीं येतां ॥ तकीं मानिती विनाश चित्ता ॥ म्हणतां प्रवेशली दुःखव्यथा ॥ तरी देव क्षोभतात ॥१७॥ 
दासदासी आपुले हाती ॥ आज्ञेमाजी सकळ वर्तती ॥ ते अवज्ञा करोनि उत्तर देती ॥ तरी देव क्षोभला जाणावें ॥१८॥ 
सहज ठेविलें धनमांदुस ॥ पुढें काढूं जातां कार्यास ॥ तें न सांपडे ठेविल्यास ॥ तरी देवक्षोम जाणिजे ॥१९॥ 
सभेस्थानीं सत्यार्थगोष्टी ॥ करितां अनृत वाटे चावटी ॥ लोक बैसती चेष्टेपाठी ॥ तरी देवक्षोभ जाणिजें ॥१२०॥ 
आपुलें धन लोकांवरी सांचे ॥ तें मागूं जातां स्वयें वाचे ॥ ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचें ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२१॥ 
आपुली विद्या तीव्रशस्त्र ॥ शत्रुकाननीं विनाशपात्र ॥ ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥२२॥ 
नसतां वांकुडे पाऊल कांहीं ॥ नागाविला जाय राजप्रवाहीं ॥ नसत्या कळीं बैसल्या ठायीं ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२३॥ 

आपुला शत्रु प्रतापापुढें ॥ मिरवी जैसा अति बापुढें ॥ त्या शरण रिघतां आपुल्या चाडें ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२४॥ 
लोकां उपकार केला विशेष ॥ तेचि लोक मानिती आपुला त्रास ॥ पाहूं नका म्हणती मुखास ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२५॥ 
नसता अधिमधीं उत्तरा ॥ नसतीच विघ्ने येती घरा ॥ तेंचि करणें परिहारा ॥ देवक्षोभ जाणिजे ॥२६॥ 
गृहीचें मनुष्य मुष्टींत सकळ ॥ असूनि वाढे गृहांत कळ ॥ आपुले न चाले कांहींच बळ ॥ तरी देंवक्षोभ जाणिजे ॥२७॥ 
तरी हेचि नीति उपदेश ॥ माता करीत आहे पुत्रास ॥ तरी बरवें नोहे हा विनाश ॥ जगामाजी मिरवेल ॥२८॥ 
तरी ह्या द्वंद्वसुखाची कहाणी ॥ पेटेल महावडवानळ वन्ही ॥ राजवैभव हें अब्धिपाणी ॥ भस्म करील निश्वयें ॥२९॥ 
ऐसा विचार करुनि मानसीं ॥ लुमावंती प्रवेशे स्वसदनासी ॥ येरीकडे मैनावतीसी ॥ उत्तर देंत नरेंद्र ॥१३०॥ 
म्हणे माय वो तव कामनीं ॥ ऐसेंचि आहे वेधक मनीं ॥ तंव त्या स्वामीची करणी ॥ निजदृष्टी पाहीन वो ॥३१॥ 
माझें मजलागीं हित ॥ तें द्यावया असेल सामर्थ्य ॥ शोध शोधितां भक्तिपंथ ॥ सहज दृष्टीं पडेल वो ॥३२॥ 

मग मी सोडूनि सकळांस ॥ तनधनमन ओपीन त्यास ॥ तूं येथून वाईट चित्तास ॥ सहसा न मानीं जननीये ॥३३॥
ऐसें वदोनि समाधानीं ॥ नृप गेला स्नानालागोनी ॥ येरीकडे अंतःपुरसदनीं ॥ काय करी लुमावंती ॥३४॥ 
परम आवडत्या स्त्रिया पांचसात ॥ तयांच्या आज्ञेंत नृपनाथ ॥ पट्टराणिया प्रीतिवंत ॥ सदा सर्वदा वर्तती ॥३५॥ 
तयांसी पाठवूनि परिचारिका ॥ बोलाविल्या सद्विवेका ॥ त्यांत लुमावंती मुख्य नायिका ॥ पट्टराणी रायाची ॥३६॥ 
वेगें मांडूनि कनकासन ॥ बैसविल्या प्रीतींकरुन ॥ तांबूलदि पुढें ठेवून वृत्तांत सांगे रायाचा ॥३७॥ 
बाई वो बाई विपरीत करणी ॥ मैनावती राजजननी ॥ विक्षेप पेटला तियेचे मनीं ॥ काय सांगू तुम्हातें ॥३८॥
कोण गावांत आला हेला ॥ जालिंदर ऐसें म्हणती त्याला ॥ त्याचा अनुग्रह देऊनियां रायाला ॥ जोग देऊं म्हणतसे ॥३९॥ 
ऐसें वैर भोगवी माता सुत ॥ निश्वय करुनि केला घटपटीत ॥ रायासी बोधितां श्रवणीं मात ॥ सकळ झाली वो बाई ॥१४०॥ 
मग राजवैभव सकळ नासलें ॥ स्तंभ भंगल्या सदन पडिलें ॥ मुळींचि अर्कालागीं गिळिलें ॥ मग अंधकार सर्वस्वीं ॥४१॥ 

मग आपण अष्टविंशती सती ॥ असूनि काय करावी माती ॥ परचक्र येऊन सकळ संपत्ति ॥ विनाशातें पावे हो ॥४२॥ 
परी येउते अर्थाअर्थी ॥ कैसी करावी ती युक्ती ॥ सांगावी आधीं योजूनि सबळ मतीं ॥ केलिया कारण मोडावे ॥४३॥ 
अगे वन्ही म्हणूं नये लहान ॥ तो क्षणें जाळील सकळ सदन ॥ तरी त्यातें करुनि सिंचन ॥ विझवूनियां टाकावा ॥४४॥ 
उशा घातला विखार ॥ मग सुखनिद्रा केवीं येणार ॥ विप भेदूनि गेल्या जठर ॥ जीवित्व काय वांचेल ॥४५॥ 
तरी प्रथमचि सारासार ॥ करुनि मोडावा सकळ प्रकार ॥ ऐसी बुद्धि रचूनि सार ॥ सुखसंपत्ति भोगा कीं ॥४६॥
ऐसी ऐकूनि तियेची उक्ती ॥ मग तर्कवितर्क करिती त्या युवती ॥ नानाबुद्धि विलाप दाविती ॥ परी निश्वय न घडे कोणाचा ॥४७॥
यापरी विशाळबुद्धी युवती ॥ विचार काढी लुमावंती ॥ की येअर्थी दिसे एक मजप्रती ॥ सुढाळपणीं नेटका ॥४८॥ 
आपुल्या गावांत जालिंदर ॥ जोगी आहे वैराग्यपर ॥ तरी तयाचा अपाय करुनि थोर ॥ निर्दाळावा सर्वस्वीं ॥४९॥ 
निर्दाळावा तरी कैसे रीतीं ॥ तयाच्या भक्तीसी मैनावती ॥ आहे तरी राजयाप्रती ॥ निवेदावें कुडे भावें ॥१५०॥ 

तरी तो तुमचा वसवसा ॥ ग्रीवे मिरवितसे भयार्थ फांसा ॥ म्हणूनि युक्ति रचिली मानसा ॥ गाढपणीं ऐकावी कीं ॥५१॥ 
निवेदावें तरी कैसें ॥ काम न आवरे मैनावतीस ॥ म्हणूनि चित्तीं उदास ॥ जालिंदर भोगितसे ॥ ॥५२॥ 
जालिंदराचा अनुग्रह देऊन ॥ जोगी करावा राजियाकारण ॥ मग करुनि पाठवावा तीर्थाटन ॥ अथवा तपाचे कारणीं ॥५३॥
मग तो गेलिया दूर देशीं ॥ गृहीं आणूनि जालिंदरासी ॥ बैसवोनि राज्यासनासी ॥ सकळ सुखा भोगावें ॥५४॥ 
ऐसें सांगूनि सकळ रायातें ॥ उदय करावा कोपानळातें ॥ मग सहजविधि जालिंदरनाथ ॥ भस्म होईल त्यामाजी ॥५५॥ 
जैसे विषय अति गोड ॥ गोडचि म्हणूनि करावा पुड ॥ मग तें मिरवे शत्रुचाड ॥ द्वंद्वसुख वाटावया ॥५६॥ 
ऐसा विचार करुनी गोमटा ॥ जात्या झाल्या त्या बरवंटा ॥ येरी सांगे राजपटा ॥ गोपीचंद मिरवला ॥५७॥ 
राजकारणीं अपार वार्ता ॥ रागरंग कुशळता ॥ मानरंजनीं नृपनाथा ॥ दिवस लोटूनि पैं गेला ॥५८॥ 
मग निशाउदय तममांडणी ॥ तेही प्रहर गेली यामिनी ॥ मग पाकशाळेंत भोजन करुनी ॥ अंतःपूरीं संचरला ॥५९॥ 

संचरला परी लुमावंती ॥ तिच्याचि गेला सदनाप्रती ॥ तिने पाहुनी राजाधिपती ॥ कनकासनी बैसविला ॥१६०॥ 
उचलोनि परमभक्तीं मांदार ॥ बैसला आहे मंचकावर ॥ गौरवूनि षोडशोपचार ॥ प्रेमडोहीं बुडविला ॥६१॥ 
मग तो राव होऊनि निर्मर ॥ रतिसुखाचा करुनि आदर ॥ यावरी गजगामिनी जोडूनि कर ॥ बोलती झाली रायातें ॥६२॥ 
हे महाराज प्रतापतरणी ॥ एक वार्ता ऐकली कानीं ॥ परी वदतां भय कीं मनीं ॥ संचरत आहे महाराजा ॥६३॥ 
जरी न बोलावें ठेवूनी गुप्त ॥ तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत ॥ वदूं तंव तरी भयांत ॥ चित्त गुंडाळा घेतसे ॥६४॥ 
ऐसा उभय पाहतां अर्थ ॥ भ्रांतीमाजी पडलें चित्त ॥ तरी सुखशब्दाचा सरुनि वात ॥ वार्ता अवघड महाराजा ॥६५॥ 
ऐसें ऐकूनि राव बोलत ॥ म्हणे सकळ सोडूनि भयातें ॥ निर्विकार कवण अर्थ ॥ असेल तैसें कळविजे ॥६६॥ 
येरी म्हणे द्याल भाष्य ॥ तरी चित्त सोडील भयदरीस ॥ मग खरें खोटें बरें रत्नास ॥ तुम्हांलागीं अर्पिन तें ॥६७॥ 
ऐसें वचन नृप ऐकतां ॥ मग करतलभाष्य झाला देंता ॥ म्हणे मम दर्पभयाची व्यथा ॥ सोडूनि वार्ता बोल कीं ॥६८॥

येरी म्हणे जी एक कुडें ॥ मातेनें रचिलें तुम्हांपुढें ॥ जालिंदर योगी विषयपांडें ॥ वश्य केला आहे की ॥६९॥ 
परी तुमचा भयाचा संदर्प ॥ अंगी विरला विषयकंदर्प ॥ तेणेंकरुनि बुद्धी कुरुप ॥ तिनें वरिली आहे जी ॥१७०॥
तुम्हांसी अनुग्रह देऊनि त्याचा ॥ वेष द्यावा योगीयाचा ॥ मग तीर्थाटनीं योग तुमचा ॥ बोळवावें तुम्हांते ॥७१॥ 
तुम्ही गेलिया तपाकारण ॥ दूरदेशी विदेशाकारण ॥ मग जालिंदराप्रती आणून ॥ राज्यासनीं ओपावा ॥७२॥ 
ऐसें प्रकरणीं सहजस्थिती ॥ श्रुत मात झालें आम्हांप्रती ॥ परी आमुचे सौमाग्यनीतीं ॥ भाग्यार्क दिव्य जाहले ॥७३॥ 
आमचें कुंकुम होतें अचळ ॥ म्हणोनि दृष्टीं आले ऐसे फळ ॥ यापरी तुम्हा नृपाळ ॥ वाईट बरें विलोका ॥७४॥ 
ऐसी ऐकोनि तियेची वार्ता ॥ उज्बळला क्रोधनळाच्या माथां ॥ मग अनर्थानळाच्या शाखा दावितां ॥ भयंकररुपी जाहलासे ॥७५॥ 
मग तो क्रोध न वदवे वाणी ॥ प्रत्यक्ष आला वडवानळ अग्नी ॥ नाथ जालिंदर समुद्रपाथी ॥ प्राशावया क्षोभला ॥७६॥ 
मग तो उठोनि तैसेचि गतीं ॥ बाहेर जाय तो नृपती ॥ मंत्री बोलावूनि सेवकांहातीं ॥ जालिंदरा पाहों चला ॥७७॥ 

शीघ्र आणोनि कामाठ्यांसी ॥ गर्ती योजिली कूपासरसी ॥ नाथ जालिंदर ते उद्देशीं ॥ तयामाजी लोटिला ॥७८॥ 
अश्वलीद न गणती ॥ तेथें सर्वत्र पडली होती ॥ ती लोटूनि गर्तेवरती ॥ नाथजती बुजविला ॥७९॥ 
ऐसें गुप्त करोनि प्रकरण ॥ राव सेवी आपुलें स्थान ॥ परी सेवकां ठेविले सांगोन ॥ मात बोलूं नका ही ॥१८०॥ 
जरी होतां मुखलंपट ॥ मम श्रोत्रीं आलिया नीट ॥ त्याचें करीन सपाट ॥ यमलोकीं मिरवीन कीं ॥८१॥ 
ऐसी ऐकूनि भयंकर वार्ता ॥ दर्पासिंह तो योजूनि माथां ॥ रागेला परी सेवकाचित्ता ॥ धुसधुसी मिरवीतसे ॥८२॥ 
इतुके प्रकरणीं मध्ययामिनी ॥ झाली म्हणूनि नेणती जनीं ॥ अर्कोदयीं पाहिला स्वामी ॥ म्हणती उठोनि गेला असे ॥८३॥ 
एक म्हणती त्याचें येथें काय ॥ स्वइच्छे बसावें वाटेल तेथ ॥ हा ग्राम नव्हे आणिक राय ॥ ग्रामवस्तीं विराजला ॥८४॥ 
ऐशी बहुतांची बहुत वाणी ॥ प्रविष्ट झाली जगालागोनी ॥ कीं जालिंदर गेला येथूनी ॥ महीं भ्रमण करावया ॥८५॥ 

ऐसी वार्ता नगरलोकीं ॥ उठली ऐकूनि परिचारिकी ॥ त्या जाऊनि साद्विवेकी ॥ मैनावतीसी सांगती ॥८६॥ 
कीं महाराज आपुला गुरु ॥ वस्तुफळाचा कल्पतरु ॥ उठोनि गेला कोठें दुरु ॥ महीं भ्रमण करावया ॥८७॥ 
ऐसें ऐकोनि मैनावती ॥ असंतोषली परम चित्तीं ॥ म्हणे मम सुताचे दैवाप्रती ॥ लाभ नाहीं आतुडला ॥८८॥ 
ऐसें म्हणोनि संकोचित ॥ नेत्रीं प्रेमाश्रु ढाळीत ॥ येरीकडे जालिंदरनाथ ॥ कैसे स्थितीं राहिला ॥८९॥ 
तरी अवश्य भविष्य जाणणार ॥ आणि मैनावतीचा लोभ अपार ॥ आणि शत्रुमित्र पाहणार ॥ एकरुपीं समत्वें ॥१९०॥ 
नातरी परम प्रतापी वासरमणी ॥ क्षणें टाकील ब्रह्मांड जाळोनि ॥ तो भद्र ज्याची विपर्यासकरणी ॥ तुष्ट कैसा राहिला ॥९१॥ 
जो द्वंद्वातीत मूर्तिमंत ॥ दंभरहित स्वरुपीं मिरवत ॥ ममता निःसंग विरहित ॥ कार्याकार्य जाणोनी ॥९२॥ 
असो गर्तेमाजी यतिनाथ ॥ वज्रासनातें घालोनि खालतें ॥ आकाशास्त्र प्रेरुनि भोंवतें ॥ स्वस्थचित्तीं बैसला ॥९३॥ 
आकाशास्त्र असतां भोंवतें ॥ लीद मिरवे सभोंवतें ॥ यापरी आकाशास्त्र माथां ॥ वज्रास्त्र स्थापिलें ॥९४॥ 

तेणेंकरोनि अधरस्थळी ॥ लीद मिरविली आहे शिरीं ॥ येरीकडे अंतःपुरीं ॥ जनवार्ता समजली ॥९५॥ 
नाथ जालिंदर गेला निघोन ॥ मग सकळ स्त्रियांचें झाले समाधान ॥ बरें झालें म्हणती निधान ॥ येऊनि पहुडल्या सेजेसी ॥९६॥ 
यापरी पुढें सुरस ॥ धुंडीसुत सांगेल श्रोतियांस ॥ तरी सर्व श्रोतीं टाकूनि आळस ॥ अवधान द्यावें पुढारां ॥९७॥ 
मालू धुंडी नरहरी वंशीं ॥ कथा वदेल नवरसी ॥ परी वारंवार श्रोत्यांसी ॥ कृपा अवधान मागतसे ॥९८॥ 
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥१९९॥ 
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment